राज्यातील ७५ गावे होणार स्मार्ट
ग्रामपंचायतींत सीसीटीव्ही, वाय-फायही
मुंबई युवा ध्येय
राज्यातील ७५ गावांत ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये बारामतीसह काटोल, चांदुरबाजार, कळमनुरी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षणासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली जाईल.
नागपूर जिल्ह्यातील मौजे सातनवरी या गावी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याचे यश पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विस्तार करण्याचे ठरवले. या प्रकल्पातून ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण इत्यादी विभागांच्या ऑनलाइन सेवा व ई-प्रकल्प, स्मार्ट कृषी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा स्मार्ट सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती असेल.
*बारामती तालुक्यातील १० गावांचा समावेश*
पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ७५ गावांमध्ये या प्रकल्पाचा प्रायोगिक तत्त्वावर विस्तार केला जाईल. बारामती (१०), काटोल (१०), चांदूरबाजार (२३), कळमनुरी (११) आणि वैभववाडी (२१) या तालुक्यांत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
